टॅगस्
भारतात तत्त्वचिंतन पुष्कळ होतं असं मानलं जातं. भारतीयांना अध्यात्माद्वारे अस्तित्वविषयक प्रश्नांची उकल करायला आवडते असंही अनेकदा दिसतं. पण भारतीय सिनेमात तत्त्वचिंतन फार क्वचित होताना दिसतं. सिनेमा हे प्रामुख्यानं करमणुकीचं साधन मानलं गेल्यामुळे कदाचित असं होत असेल, किंवा प्रेक्षकांचा गोष्टीतला रस कायम ठेवत तत्त्वचिंतन साधणं ही कठीण गोष्ट आहे म्हणूनदेखील असं होत असेल. आनंद गांधी नावाच्या नवख्या दिग्दर्शकाला मात्र पदार्पणातच ही कसरत साधली आहे. ‘शिप अॉफ थिसिअस’ हा त्याचा चित्रपट येत्या काही दिवसांत भारतात प्रदर्शित होईल. त्याचा थोडक्यात परिचय इथे दिला आहे. लेखात कथानक गरजेपुरतंच सांगितलेलं आहे. त्यामुळे लेख वाचल्यामुळे रहस्यभेद वगैरे होणार नाही, किंवा चित्रपट पाहताना रसभंग होणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे.
‘स्वत्व’ म्हणजे नक्की काय? माणसाच्या ‘स्व’विषयीच्या संकल्पनेत कसा बदल होऊ शकतो? आणि तो झाला तर आधीचा ‘स्व’ आणि नंतरचा ‘स्व’ एकच मानावा की वेगवेगळे मानावे लागतील? अशा प्रकारचे प्रश्न हा चित्रपट विचारतो. चित्रपटाच्या शीर्षकाला ग्रीक तत्त्वज्ञानातला संदर्भ आहे. प्लुटार्कनं विचारलेला हा प्रश्न ‘थिसिअसचा पॅराडॉक्स‘ म्हणून ओळखला जातो –
एखादं जहाज ज्या घटक भागांपासून बनलेलं असतं ते सगळे एक एक करत काढून टाकले आणि त्यांच्या जागी जर दुसरे पण तसेच घटक बसवले तर ते जहाज मूळ होतं तेच राहील, की एक वेगळंच जहाज बनेल?
ह्या प्रश्नामागच्या अस्तित्वविषयक तत्त्वचिंतनाकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी दिग्दर्शक तीन गोष्टी सांगतो. त्यांच्यात काही समान सूत्र आहे, तर प्रश्नाचे वेगवेगळे पैलू लक्षात यावेत म्हणून अनेक फरकही आहेत.
पहिली गोष्ट एका आंधळ्या स्त्रीची आहे. ही स्त्री इराणी आहे आणि ती भारतात वास्तव्य करते आहे. आंधळी असूनही ती छायाचित्रकार आहे. आपल्या पंगुत्वासह वास्तवाकडे पाहण्याची तिची दृष्टी ही खास तिची आहे. तिची दृष्टी नेत्रदानावाटे पूर्ववत होण्याची शक्यता तिला तिच्या अनोख्या कार्यपद्धतीविषयी आणि त्यात होऊ घातलेल्या बदलांविषयी गंभीर विचार करायला भाग पाडते. मुंबईच्या रस्त्यांवरून फिरत असताना ती कसे फोटो घेते आणि नंतर संगणकावर ते कसे एडिट करते हे स्वत:ला छायाचित्रकार समजणाऱ्या कुणाहीसाठी एक वस्तुपाठ आहे.
दुसरी गोष्ट एका जैन (किंवा तत्सम) भिख्खूची आहे. पराकोटीची अहिंसा पाळणारा हा भिख्खू प्राण्यांवर औषधांच्या किंवा प्रसाधनांच्या चाचण्या घेण्याविरोधात आणि एकंदर प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांना मिळणाऱ्या क्रूर वागणुकीविरोधात न्यायालयीन लढा लढतो आहे. अचानक उद्भवलेल्या आजारपणात त्याची अहिंसक तत्त्वनिष्ठा पणाला लागते.
तिसरी गोष्ट एका स्टॉकब्रोकरची आहे. पैसा कमावण्यापलीकडे कशातही त्याला रस नाही. त्याची आजी डाव्या चळवळीत कार्यरत आहे त्यामुळे अर्थात तिचे आपल्या नातवाच्या जीवनमूल्यांशी मतभेद आहेत. आपल्या शरीरात बसवलेली किडनी कदाचित एखाद्या गरीबाला फसवून त्याच्या नकळत काढून घेतलेली असेल ह्या कल्पनेनं ह्या स्टॉकब्रोकरचं आयुष्य ढवळून निघतं.
कथेविषयी याहून अधिक तपशील देण्याची गरज नाही. प्रत्येक कथेतल्या प्रमुख पात्राला काही जीवनसंघर्षाला सामोरं जावं लागतं. दुसऱ्याच्या अवयवाचं आपल्या शरीरात रोपण होण्याच्या शक्यतेतून हा संघर्ष उद्भवतो. ह्या संघर्षात त्या पात्राच्या जीवनदृष्टीविषयी आणि त्याच्या अस्तित्वाविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. पहिल्या गोष्टीतल्या स्त्रीचं छायाचित्रकार असणं हे तिच्या अंध असण्याशी इतकं निगडित असतं की दृष्टी प्राप्त झाली तर आपण कलाकार म्हणून काय शिल्लक राहू असा तिचा प्रश्न आहे. आतापर्यंत स्वार्थापलीकडे विचारच न केलेल्या ब्रोकरला ‘परमार्थ करावा का?’, ‘किती परमार्थ पुरेसा?’ आणि ‘नक्की कसा परमार्थ केला म्हणजे तो योग्य?’ ह्याबद्दल विचार करणं भाग पडतं. भिख्खूसाठी तर औषधं घेणं, शस्त्रक्रिया करून घेणं म्हणजे आपण ज्या तत्त्वांवर विश्वास ठेवतो त्यांच्याशी प्रतारणा करणं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तो जीवनमरणाचाच प्रश्न होतो.
त्या प्रश्नांची तड कशी लागते ते चित्रपट पाहून समजेलच. पण दृकश्राव्य भाषेतून आशय व्यक्त करण्यात चित्रपट कसा आणि किती यशस्वी ठरतो ते पाहू.
आंधळ्या फोटोग्राफरच्या गोष्टीत दृकश्राव्य माध्यमाचा कस लागला आहे. ऐकून असाध्य वाटणारी ही गोष्ट एकीकडे साध्य करायची आणि त्याच वेळी तिला तत्त्वचिंतनात्मक डूब द्यायची हे सोपं नाही. इथे ध्वनिलेखन चांगल्या प्रकारे वापरलं आहे. आंधळ्या मुलीला काय ऐकू येतं आणि त्यावरून ती फोटो घेण्यासाठी थांबते ह्यात त्याची मदत होते. आपण रस्त्यानं जातो तेव्हा तिथे ध्वनींचं एक मोठं जग असतं. त्या संवेदनेतून ही आंधळी मुलगी फोटो घेत जाते आणि नंतर ती संगणकावर ते मॅनिप्युलेट करते. ह्या तपशीलांतून दिग्दर्शक तिची प्रतिभा काय जातकुळीची आहे आणि तिच्या कलेमागचा तिचा विचार काय आहे हे दाखवून देतो. तिचे तिच्या मित्राबरोबरचे संवाद, बांधकाम चालू असलेल्या ठिकाणच्या कामगाराबरोबरचे तिचे संवाद अशा छोट्यामोठ्या गोष्टींतून ही कथा वळणं घेते आणि तत्त्वाचा तिढा मांडते.
भिख्खूची गोष्ट ही चर्चानाट्य होण्याचा सर्वात मोठा धोका होता, कारण भिख्खूनं आपल्या पंथाचं आणि इतरांचंही तत्त्वज्ञान कोळून प्यायलेलं असतं. ज्यानं आपलं मूळचं नाव बदलून चार्वाक असं नाव घेतलेलं असतं असा त्याचा वकील नावाप्रमाणे विवेकवादी असतो आणि त्यांचे वाद झडतातही. पण त्यांना विनोदाची झालर आहे. शिवाय पहिल्या कथेप्रमाणेच इथेही दृश्यभाषा आशय अधोरेखित करण्याची मोठी कामगिरी बजावते.
भिख्खू आणि तो राहतो ते आजचं मुंबई ह्यांना सतत एकमेकांशेजारी दाखवून दिग्दर्शक भिख्खूचा तिढा स्पष्ट करत जातो आणि तो पाहणाऱ्याला अंतर्मुख करतो. त्यात भिंतीवरची पोस्टर्स आणि ग्राफिटी येतात; पाऊस आणि गर्दी येते; पाण्याचे पाईप्स येतात. ह्या सर्वांतून मार्ग काढत ताडताड चालत जाणारा भिख्खू अतिशय समर्थ वाटतो. आणि तरीही अजस्र पवनचक्क्या आणि त्यांच्या सावल्यांखाली छोटा भासणाऱ्या भिख्खूच्या मर्यादाही हळूहळू जाणवू लागतात. विज्ञान-तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवून तो जणू आयुष्यापासून दूर पळतो आहे असं भासू लागतं. सुरवंट, सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे आदिजीव अशा घटकांचाही वापर पटकथेत प्रभावीपणे करून घेतला आहे.
स्टॉकब्रोकरची कथा ही काहीशी विनोदी अंगानं जाते. नुकतीच मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया झालेला ब्रोकर हॉस्पिटलमध्ये बसल्याबसल्या पैसे कमावण्याच्या मागे लागलेला दिसणं, त्याच्या गंमतीशीर, जाड्या, मठ्ठ पण गोड मित्राचं व्यवहारी जगाचा दृष्टिकोन सतत आपल्या वर्तनातून दाखवत राहणं, किंवा त्याची समाजवादी आजी तो बरा झाल्याप्रीत्यर्थ ‘पार्टी’ म्हणून एका सूफी गायकाचा कार्यक्रम ठेवते तो प्रसंग असे अनेक घटक हलक्याफुलक्या वळणानं कथेला हळूहळू गंभीर आशयाकडे नेतात. अत्यंत विचारपूर्वक लिहिलेली अशी पटकथा क्वचितच आजकालच्या भारतीय सिनेमाला लाभते.
ह्यातला अवकाशाचा वापरही रोचक आहे. हॉस्पिटल, चिंचोळ्या झोपडपट्ट्या अशा बंदिस्त अवकाशांत संकुचित पटकथा हळूहळू विस्तीर्ण अवकाशाकडे जाते. तो सगळा प्रवास पुन्हा एकदा दृश्यमाध्यमावरची दिग्दर्शकाची पकड दाखवून देतो.
‘शिप अॉफ थिसिअस’ ह्यापूर्वी अनेक महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. त्याला काही पारितोषिकंसुद्धा मिळाली आहेत. १९ जुलैला तो भारतात प्रदर्शित होईल. चित्रपटाची प्रकृती पाहता बॉक्स अॉफिसवर त्याला फारसं यश मिळेलसं वाटत नाही. त्यामुळे आठवड्याभरात तो येऊन नाहीसा झाला तर त्यात नवल वाटण्यासारखं काही नसेल. पटकथा, संवाद, अभिनय यांबरोबरच ध्वनिलेखन, छायालेखन, चित्रचौकटीतला अवकाश अशा घटकांद्वारे तत्त्वचिंतनासारखा गंभीर आशय प्रभावीपणे मांडण्यात आणि त्या आशयाला काव्यात्म करण्यात यशस्वी ठरणारे चित्रपट भारतात निर्माण होण्याची परंपरा नाही. त्यामुळे मोठ्या पडद्यावरच पाहावा असा हा अनुभव आहे. ज्यांना तत्त्वचिंतनात्मक चित्रपट पाहायला आवडेल, आणि ज्यांना भारतीय चित्रपटानं घेतलेलं हे एक वेगळं आणि धाडसी वळण पाहायला आवडेल अशांना ह्या लेखाद्वारे पूर्वसूचना दिली आहे. लोक त्याचा फायदा घेतील अशी आशा आहे.
चित्रपटाचा ट्रेलर –
सध्या हा चित्रपट मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळुरू आणि दिल्ली इथे प्रदर्शित होईल. त्याशिवाय एखाद्या शहरात तो प्रदर्शित व्हावा अशी इच्छा असली तर इथे आपलं मत देऊ शकता.