टॅगस्
इतिहास, तत्त्वज्ञान, नरहर कुरुंदकर, पुस्तक, पुस्तक परिचय, मराठी, महाराष्ट्र, लोकहितवादी, विचारवंत, शिवाजी, संस्कृती, साहित्य, सॉक्रेटिस
‘नरहर कुरुंदकर’ ह्या नावाला महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक वलय होतं; मर्यादित प्रमाणात आजही आहे. त्यामागे अनेक कारणं होती – त्यांचा मार्क्सवाद, त्यांचं नास्तिक असणं, शिवाजी किंवा मनुस्मृती अशा विषयांवरची त्यांची चिकित्सा, त्यांची साहित्यसमीक्षा, विद्यार्थीप्रियता आणि प्रभावी वक्तृत्व – अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. निजामाच्या राजवटीत जन्म आणि वाढ, समाजवादी वर्तुळात वावर, मराठवाड्यातल्या परंपराप्रिय ब्राह्मण घराची पार्श्वभूमी, मामा ना. गो. नांदापूरकरांचा लहानपणापासूनचा सहवास, हमीद दलवाईंशी मैत्री अशा अनेक घटकांनी त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेला पैलू पाडले. महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून त्यांची ख्याती झाली. १९८२ साली अवघ्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनानं त्यामुळे अनेकजण हळहळले.
ह्या पार्श्वभूमीवर ‘निवडक नरहर कुरुंदकर’ म्हणून काही खंड प्रकाशित होणार असल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची असणार. जुलै २०१३ मध्ये देशमुख प्रकाशनातर्फे त्या प्रकल्पाअंतर्गत पहिला खंड प्रकाशित झाला. संपादन ‘साधना’ परिवारातल्या विनोद शिरसाठ ह्यांचं आहे. व्यक्तिचित्रं हा पहिल्या खंडाचा विषय आहे. कुरुंदकरांनी लिहिलेली व्यक्तिचित्रं, त्यांचं स्वत:विषयीचं लिखाण आणि त्यांच्याविषयी इतरांनी केलेलं लिखाण असं ह्या खंडाचं स्वरूप आहे. निवड करताना सध्या पुस्तकरूपात सहज उपलब्ध असलेलं कुरुंदकरांचं लिखाण वगळून ती केली आहे असं संपादक म्हणतात. त्यामुळे पूर्वी प्रकाशित झालेलं पण आता सहज वाचायला न मिळणारं लिखाण इथे वाचायला मिळतं. वरच्या परिच्छेदात उल्लेख केलेले कुरुंदकरांचे अनेक पैलू त्यात दिसतात.
सुरुवातीला ‘व्यक्तिपूजा : एक चिकित्सा’ ह्या स्फुटाद्वारे कुरुंदकरांचे व्यक्तिचित्रणाबद्दलचे विचार दिले आहेत. संपादकांचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण, आपण पुढे जे वाचणार आहोत त्याची संदर्भचौकट त्यामुळे स्पष्ट होते. ‘ज्या व्यक्तींविषयी आदर किंवा श्रद्धा वाटत असते त्यांचीही चिकित्सा करायला हवी; त्यांचे सर्व विचार पटायलाच हवेत असं नाही’; किंवा, ‘एखादी व्यक्ती नक्की कशासाठी मोठी मानली जाते आणि तुम्हाला नक्की कोणत्या क्षेत्रातल्या योगदानासाठी ती महत्त्वाची वाटते ह्याची चिकित्सा करून त्या व्यक्तीचं मोठेपण ठरवावं’, अशी कुरुंदकरांची इथे व्यक्त झालेली मतं त्यांच्या तर्कनिष्ठ लौकिकाला साजेशीच आहेत. ‘आपल्या वंदनीय नेत्यांच्या चुका आणि मर्यादा सभ्य शब्दांत नोंदवायला आपण तयार आहोत का? निदान इतर कुणी ते केलं तर सभ्यपणे ते ऐकून घेण्याची क्षमता तरी आपल्यात आहे का?’ हे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आजच्या असहिष्णू वातावरणात विशेष मननीय आहेत.
त्यानंतर, म्हणजे पहिल्या विभागात काही ऐतिहासिक व्यक्तींबद्दलचे लेख आहेत. पहिला लेख सॉक्रेटिसबद्दल, किंबहुना त्याच्या मृत्यूबद्दल आहे. ‘तर्कशुद्ध विचारांचा आग्रह धरणारा सॉक्रेटिस आत्म्याचं अमरत्व मानत होता, मग तो कितपत तर्कशुद्ध मानावा?’, असा सवाल कुरुंदकर करतात. सॉक्रेटिसनं आपला गुन्हा मान्य करून अथेन्स सोडायचा पर्याय स्वीकारला असता, तर त्याला मरण पत्करावं लागलं नसतं, हे सांगून ‘नि:स्वार्थ बलिदानाची गरज तर्कानं पटवून देता येईल असं वाटत नाही’ असंही ते म्हणतात. म्हणजे सॉक्रेटिसच्या वर्तनातल्या ह्या गोष्टी अतार्किक आहेत असं ते मानतात. शिवाय, येशूला क्रूसावर ठार मारणाऱ्या पॅलेस्टिनी न्यायासनापेक्षा गुन्हा कबूल करून जगण्याचा पर्याय देणारं अथेन्सचं न्यायासन अधिक सुसंस्कृत आहे असं सांगून ‘त्यामुळे मला सॉक्रेटिसइतकाच त्या न्यायासनाबद्दल आदर आहे’ असं कुरुंदकर म्हणतात. ‘विचारांची उपेक्षा करणाऱ्या किंवा त्यांना वंदनीय मानून त्यांची समाधी बांधणाऱ्या समाजापेक्षा विचारांनी हादरून जाणारा, चवताळणारा अथेन्सचा समाज मला सॉक्रेटिसहूनही अधिक पूज्य वाटतो’, अशी मांडणी ते करतात.
ह्या मांडणीबद्दल मतभेद शक्य आहेत. ह्या मांडणीत आणि कुरुंदकरांच्या व्यक्तिगत आचार-विचारांत काही विरोधाभास किंवा सुसंगती आढळते का ते पाहिलं तर काय दिसेल? स्वत: कुरुंदकर उपेक्षेचे धनी होते. त्यामुळे, आणि परंपराप्रिय भारतीय समाजात होणारी विचारांची अवहेलना किंवा अंधपूजा त्यांनी जवळून पाहिली असल्यामुळे अथेन्सच्या समाजाबद्दलची त्यांची भावना समजू शकते. पण आज आपण वातावरण ढवळून काढणाऱ्या असहिष्णू जगात वावरतोय. तालिबानी दहशतवाद असो, की ‘सनातन प्रभात’चं नरेंद्र दाभोलकरांबाबतचं गरळ ओकणं असो; आपल्याला न पटणाऱ्या विचारांमुळे वेगवेगळ्या पातळींवरचं ते चवताळणंच आहे. मग ह्याला कुरुंदकरांचं तर्कशास्त्र लावावं का? की त्याऐवजी, विचारांनी चवताळून जाणारा समाज तालिबानीसुद्धा असू शकतो, आणि तो येशूला क्रूसावर चढवणाऱ्या न्यायासनाइतकाच क्रूर असू शकतो हे लक्षात घ्यावं? मग त्यापेक्षा ‘मला तुझे विचार पटत नसले, तरीही मी त्यांना केवळ उपेक्षेनं किंवा अनुल्लेखानं मारेन; तुला जिवे मारणार नाही’ असं म्हणणारा समाज अधिक सुसंस्कृत नाही का?
स्वत: कुरुंदकर नास्तिक होते. ‘मी आस्तिक का नाही?’ हा त्यांचा लेख ह्याच पुस्तकात आहे. तरीही आपल्या कुटुंबातल्या धार्मिक कार्यांतला त्यांचा सक्रीय सहभाग आणि त्याचं ते करत असलेलं समर्थन ह्यामुळे त्यांच्यावर टीकादेखील झाली होती. सॉक्रेटिसनं (मान्य नसलेला) गुन्हा जाहीररीत्या मान्य करून शहर सोडण्याचा पर्याय निवडणं हे अधिक तार्किक झालं असतं असं म्हणणारे कुरुंदकर अणि नास्तिक असूनदेखील कौटुंबिक धार्मिक कार्यातला आपला सहभाग मान्य करणारे आणि त्याचं समर्थन करणारे कुरुंदकर ह्यांत काही दुवा सापडतो का?
असो. ‘सॉक्रेटिस सुसंगत किंवा तर्कशुद्ध नसला तरीही त्याचा ह्या दोन गोष्टींबद्दलचा आग्रह महत्त्वाचा आहे, आणि विचारांशी तडजोड न करता त्यानं स्वीकारलेलं मरण आपल्याला विलोभनीय वाटतं’, असंही कुरुंदकर म्हणतात. ‘इतर कुणाबरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिसबरोबर नरकात राहणं चांगलं’, असंही ते म्हणतात. त्याच न्यायानं कुरुंदकरांच्या काही आचार-विचारांत विरोधाभास आढळले तरीही त्यांचे जे विचार मननीय वाटतात ते स्वीकारून त्यांचं मोठेपण मान्य करता यावं. शिवाय, ‘व्यक्तिपूजा : एक चिकित्सा’ ह्या त्यांच्याच स्फुटानुसार असंही म्हणता येईल की त्यांचं नास्तिक असणं हे काही त्यांचं महाराष्ट्राला मोठं योगदान आहे असं नसल्यामुळे हा मुद्दा गौणही मानता येईल.
सॉक्रेटिसनंतर शिवाजीराजांच्या पराभवांविषयीचा लेख आहे. शिवाजी महाराजांचं पराक्रमांनी भरलेलं जे आयुष्य नेहमी सांगितलं जातं त्याला छेद देण्याचा प्रयत्न इथे आहे. स्वराज्याचं स्वप्न पुरं होईल की नाही ह्याविषयीची सततची अनिश्चितता, वारंवार होणारे हल्ले आणि त्यातून बाहेर पडणारा शिवाजी ह्यात दिसतो. आदिलशाही आणि मोगल सत्ता ह्यांचं बलाढ्य सामर्थ्य आणि त्याला सामोरं जाणारी, त्या मानानं छोटी असणारी शिवाजीची सेना असा पट ते मांडतात. मुरारबाजी, बाजीप्रभूसारखे मोहरे गमवावं लागणं, त्यामुळे मिळालेल्या पराकाष्ठेच्या विजयांनंतर लगेच दुसऱ्या संघर्षाची सुरुवात, करावे लागलेले तह असा महाराजांचा धकाधकीचा जीवनक्रम इथे समोर येतो. मिर्झा राजेंसमोर आपण टिकू शकणार नाही ह्या जाणीवेतून आलेला पुरंदरचा तह आणि नंतर आगऱ्याला जाणं ह्याला राजवाड्यांसारख्या इतिहासकारानं जो चातुर्याचा मुलामा दिला आहे तो सत्याचा अपलाप आहे असं कुरुंदकर मांडतात. आगऱ्याहून सुटका झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आलेल्या शिवाजीपाशी आधीच्या विजयांमधलं फारसं काही शिल्लक नव्हतं हे कुरुंदकर सांगतात आणि त्या पार्श्वभूमीवर काही वर्षांत राज्याभिषेकापर्यंत त्याची झेप गेली हे ते नमूद करतात. शिवाजीचे पराभव केवळ शक्ती कमी पडली म्हणून झालेले आहेत असं कुरुंदकर म्हणतात. म्हणजे गाफीलपणा, अव्यवहारी बेसावधपणा, चुकीचं नियोजन, किंवा खचलेली हिंमत अशा कारणांमुळे झालेले ते पराभव नाहीत; हे एक प्रकारचं शिवाजीचं मोठेपण आहे, अशी मांडणी ते करतात. ती अर्थात रोचक आहे. शिवाजीचा उदोउदो करण्याच्या पार्श्वभूमीवर ती वेगळी वाटेल. पण तत्कालीन किंवा आधीच्या इतिहासकारांनी अशी मांडणी केली होती का, हे पाहायला हवं. १९७७ साली हा लेख छापून आला होता. तेव्हा त्यातल्या विचारांचं नावीन्य इतिहासकारांत कितपत होतं आणि त्याचं स्वागत कशा प्रकारे झालं हे कुणाला माहीत असलं तर ते समजून घ्यायला आवडेल.
ह्यानंतरचा लेख लोकहितवादींवर आहे. त्यात लोकहितवादींच्या मर्यादा म्हणून अनेक गोष्टींचा उल्लेख आहे : इंग्रजांच्या सेवेत विविध पदं भूषवून त्यांनी सधन मध्यमवर्गीय राहणीमानात आयुष्य घालवलं; ते धर्मश्रद्ध होते; त्यांचा सुधारणावाद ‘चार लेख लिहून गप्प बसण्याच्या मर्यादेतला’ होता; त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी कधी झीज सोसली नाही; कर्त्या सुधारकाच्या पाठीशी राहिल्यामुळे येणारा वादही त्यांनी टाळला; त्यांच्या टीकेचा भर ब्राह्मणांवर राहिला; ती टीका रास्त असली, तरी ‘मुळातच हिंदू समाजात असलेली विषमता आणि अन्याय्य समाजव्यवस्था यांची लोकहितवादींना फारशी जाणीव झालेली दिसत नाही’, अशी मांडणी कुरुंदकर करतात. (ह्या सर्व विवेचनासाठी गोवर्धन पारीख ह्यांच्या पृथक्करणाचा त्यांनी आधार घेतला आहे हे ते मान्य करतात.)
‘इंग्रज व्यापाराच्या निमित्तानं देशाची लूट करत आहेत ह्यातली गुंतागुंत लोकहितवादींना शेवटपर्यंत कळलेली दिसत नाही’, असं कुरुंदकर म्हणतात. पण, ‘इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीची लोकहितवादींना कल्पना होती; इंग्रजांच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि ह्या देशाला दारिद्र्य येते, असे लोकहितवादींनी म्हटले आहे’, असा उल्लेख विश्वकोशात आहे. मग ह्यातलं काय खरं मानायचं?
इंग्रजांनी दिलेल्या संधीचा फायदा घेऊन लोकांनी शिकावं आणि आपल्या क्षमतेनुसार हुद्दा मिळवावा असंच लोकहितवादींना वाटे आणि त्यांनी तसंच आचरण केलं असं म्हणता येईल. पण ही आचार-विचारांतली सुसंगती होती असं कुरुंदकर म्हणत नाहीत. सुधारणावादी असूनही त्यांचं सश्रद्ध असणं मात्र कुरुंदकरांना खुपतं. इथे पुन्हा कुरुंदकरांचं अश्रद्ध असूनही घरातल्या कार्यांत सहभागी होणं आणि त्याचं समर्थन करणं आठवल्याशिवाय राहत नाही. माझ्या तत्त्वांत बसत नाही म्हणून मी एखादी गोष्ट करणार नाही असा आग्रह धरून घरच्यांचा रोष पत्करणं प्रत्येकालाच जमेल असंही नाही. पण मग लोकहितवाद्यांच्या आचार-विचारांत जर सुसंगती नव्हती तर मग तशीच ती कुरुंदकरांच्याही नव्हती हे मान्य करावं लागेल आणि दोघांच्या काळांतला फरकही लक्षात घ्यावा लागेल.
‘जातिभेद’ नावाचं एक पुस्तक लोकहितवादींच्या नावावर आहे. ‘शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि प्रभावामुळे जातिव्यवस्था नाहीशी होईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. मात्र, जोपर्यंत जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत त्यांच्यांत द्वेषमत्सर तरी असू नये, असे त्यांना वाटत होते’, असा विश्वकोशात उल्लेख आहे. ”माहारासदेखील नमस्कार करावा. त्यांत आहे काय ?’ अशी त्यांची विचारसरणी होती’ असाही उल्लेख आहे. धर्मसुधारणेसाठी त्यांनी सांगितलेल्या सोळा कलमांत ‘आपल्या जीवासारखा दुसऱ्याचा जीव मानावा; भजनपूजन संस्कार स्वभाषेत करावे; संस्कृत भाषेचा आग्रह नको; आचारापेक्षा नीती प्रमुख असावी; एका माणसाने दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू नये; जातीचा अभिमान नसावा; कोणीही कोणताही रोजगार करावा’ असं म्हटल्याचाही विश्वकोशात उल्लेख आहे. ते बालविवाह, हुंडा वगैरे प्रथांच्या विरोधात होते. पेशवाईच्या अस्तानंतर अवघ्या पाच वर्षांनी जन्मलेल्या लोकहितवादींनी त्या काळाच्या पुढे जाऊन विचार केला हे तर कुरुंदकरांनादेखील मान्य आहे. त्यामुळे मग कुरुंदकरांची टीका काहीशी अस्थानी आहे की काय, असं वाटत राहतं.
(क्रमश:)
संदर्भ – विश्वकोश